HELLO SOLAPUR | महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रातील एकूण 7 राज्यसभा जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रियेनुसार 5 मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार असून 16 मार्च रोजी मतदान होईल. मतमोजणी त्याच दिवशी पार पडणार आहे.
या निवडणुकीत विविध पक्षांचे अनेक ज्येष्ठ खासदार निवृत्त होत असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.
भाजपचे तीन खासदार निवृत्त :
भारतीय जनता पार्टीकडून राज्यसभेवर असलेले खा. डॉ. भागवत कराड, खा. धैर्यशील पाटील आणि भाजप कोट्यातून निवडून आलेले खा. रामदास आठवले यांचा कार्यकाळ संपत आहे. भाजप या तिन्ही जागांवर कोणाला उमेदवारी देणार, तसेच पुन्हा त्याच खासदारांना संधी मिळणार का, याबाबत पक्षांतर्गत चर्चा सुरू आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष :
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खा. शरद पवार आणि खा. फौजिया खान हे दोन खासदार निवृत्त होत आहेत. विशेषतः शरद पवार पुन्हा राज्यसभा निवडणूक लढवणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यांच्या निर्णयावर पक्षाचे पुढील राजकीय धोरण आणि जागावाटप अवलंबून राहणार असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून खा. प्रियांका चतुर्वेदी यांचा कार्यकाळ संपत आहे. पक्षाकडून त्यांना पुन्हा उमेदवारी दिली जाते का, की नव्या चेहऱ्याला संधी मिळते, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
काँग्रेसकडून एक जागा :
काँग्रेस पक्षाकडून खा. रजनी पाटील या निवृत्त होत आहेत. काँग्रेससाठी ही जागा महत्त्वाची मानली जात असून पक्ष नेतृत्व कोणाला संधी देणार याकडे लक्ष आहे.
7 जागांसाठी राजकीय गणित :
महाराष्ट्र विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपावर चर्चा सुरू आहे. या निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात आणि कोणते नवे चेहरे राज्यसभेत जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पुढील घडामोडींवर लक्ष :
उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर संभाव्य उमेदवारांची नावे स्पष्ट होतील. त्यामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.











