HELLO SOLAPUR | सामाजिक प्रश्न, बिहार निवडणूक, महापालिका राजकारण, शेतकरी प्रश्नासह अनेक मुद्द्यांवर शरद पवारांनी थेट भाष्य केले आहे.
सोलापूरमध्ये झालेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज विविध महत्त्वाच्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय विषयांवर स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. सामाजिक तणावापासून बिहार निवडणुकीपर्यंत, महापालिका निवडणुकीपासून शेतकरी प्रश्नांपर्यंत अनेक विषयांवर त्यांनी आपले मत व्यक्त केले.
बिहार निवडणुकीवर बोलताना शरद पवार म्हणाले, आमची माहिती वेगळी होती, पण निकाल वेगळा आला. मात्र लागलेला निकाल स्वीकारायचा असतो.
लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांद्वारे महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्येही महिलांना थेट लाभ देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
नगरपालिका निवडणुकीत पैसे वाटतात हे ऐकले होते, पण सरकारमार्फत संपूर्ण महिलांना 10 हजार देणे आम्ही कधी ऐकले नव्हते.
या योजनेचा निवडणुकीवर झालेला परिणाम लोकांनी ठरवावा जर दहा हजार देणे हेच यशाचे कारण असेल, तर आम्हाला बसून विचार करावा लागेल.”
“उद्याच्या 1 ते 19 तारखेपर्यंत संसदेचे अधिवेशन आहे. विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांसह आम्ही या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत.” या विषयावर एक ठोस धोरण ठरवण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
सामाजिक प्रश्नांवर शरद पवार यांनी स्पष्ट मत मांडले, ते म्हणाले सामाजिक प्रश्नावर एका विचाराने चालणारे हे शहर आहे. अलीकडच्या काळात काही शक्ती जात–धर्माच्या नावावर दुरावा निर्माण करत आहेत, हे देशाच्या ऐक्यासाठी धोकादायक असल्याचे त्यांनी म्हटले.
समाजात फूट पाडणाऱ्या प्रवृत्ती रोखण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
नगरपरिषद आणि महापालिका निवडणुका यापूर्वी कधीही नगरपरिषद निवडणुका इतक्या लांबणीवर पडल्या नव्हत्या.”
स्थानिक नेतृत्वाने एकत्र आले पाहिजे, असे पवार यांनी सुचवले. “भाजपला बाजूला ठेवून जिथे एकत्र येता येईल तिथे एकत्र येणे योग्य आहे.”
राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “मी त्यांच्या विधानाचे स्वागत करतो.”
यापुढे भाष्य टाळत त्यांनी संयत भूमिका ठेवली.
तरुण शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर आलेल्या पत्राबद्दल बोलताना ते म्हणाले की, “पत्र मिळाले हे खरं आहे, पण मी त्यावर विचार केला नाही. एका सहकाऱ्याने मला ते दाखवले.” पत्रकारांनी हा मुद्दा प्रसारमाध्यमांकडे नेल्याची त्यांनी नोंद घेतली. अनेक ठिकाणी बेरोजगारी वाढत असून त्याचा परिणाम तरुण पिढीवर गंभीरपणे होत असल्याचे त्यांनी मान्य केले.
आमदार राजू खरे यांच्याबाबत म्हणाले, “मी त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही.”आमदारांनी पक्षाच्या चौकटीबाहेर जाऊ नये, असे त्यांनी सुचवले.
स्थानिक पक्षांच्या अस्तित्वावर भाष्य करताना पवार म्हणाले, पक्ष असे संपत नसतात, विचार संपत नाही. 1957 मध्ये काँग्रेसचा पराभव झाला होता पण काँग्रेस पुन्हा उभी राहिली, याची आठवण त्यांनी करून दिली.
“गांधी-नेहरू विचार स्वीकारणारी काँग्रेस संपणारी नाही. ती पुन्हा वेगळ्या स्थितीत पोहोचेल.” एकूणच शरद पवार यांनी आज सोलापूरमध्ये विविध ज्वलंत राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर बिनधास्त, थेट आणि सखोल भूमिका मांडली.











