HELLO SOLAPUR | सोलापूरात बँक ऑफ महाराष्ट्रच्या नवी पेठ शाखेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्याला सोयाबीनच्या बीलापोटी मिळालेला चेक बँकेत भरल्यानंतर तो चोरीला गेला असून, चोरी झालेला तब्बल चार लाख रुपयांचा चेक अज्ञात व्यक्तीने वटवल्याचं उघड झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बार्शी तालुक्यातील शेतकरी उत्तम दत्तात्रय जाधव यांनी आपला चेक बँक ऑफ महाराष्ट्रच्या नवी पेठ शाखेत भरला होता. मात्र काही दिवसांनी संबंधित रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली नाही. चौकशीअंती समजले की, हा चेक अनोळखी व्यक्तीने चोरून वटवला आहे.
सुरुवातीला बँकेकडून “शेतकऱ्याने चेक भरलाच नाही” असा दावा केला गेला. परंतु सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर बँकेने आपली चूक मान्य केली. तरीदेखील गेल्या आठ दिवसांपासून बँकेचे अधिकारी शेतकऱ्याला वारंवार चकरा मारायला लावत आहेत.
घटनेचा तपशील :
– शेतकऱ्याच्या नावाचा ₹४ लाखांचा चेक बँकेत भरल्यानंतर चोरीला.
– चेक बँकेच्या चेक ड्रॉप बॉक्समधून अमर तेपेदार या व्यक्तीने चोरल्याची प्राथमिक माहिती.
– या प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रकडून पोलिसांकडे तक्रार दाखल.
– शेतकरी उत्तम जाधव यांनीही यासंदर्भात पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
– बँक प्रशासनाने माध्यमांसमोर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. राष्ट्रीयकृत बँकेतील अशी मोठी दुर्लक्षाची घटना समोर आल्याने बँकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
दरम्यान सोलापुरातील बँक ऑफ महाराष्ट्र कडून पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या नवी पेठ शाखेतून एका अज्ञात व्यक्तीने बँकेच्या चेक बॉक्समधून चेक चोरला आहे.
चोरलेला चेक हा अमर तेपेदार नामक व्यक्तीच्या खात्यात जमा झाल्याची तक्रार बँकेच्या मॅनेजरकडून पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
दरम्यान बँक प्रशासनाने माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मात्र आमची कार्यालयीन प्रक्रिया सुरु असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.









