HELLO SOLAPUR | सोलापूर जिल्ह्यात मागील काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच शिवसेना शिंदे गटात पक्षांतर्गत धुसफूस वाढीला लागली आहे.
पक्षांतर्गत वर्चस्ववादातून शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी आपल्या समर्थकांसह पक्षाच्या सर्व पदांचा तसेच सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये जाणार असल्याचं स्पष्ट केलं.
शिवसेना शिंदे गटातील हा धुरळा खाली बसतो न बसतो तोवर आता महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटातून अनेक निष्ठावंत नेते भाजपच्या उंबरठ्यावर असल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंबईमध्ये सोलापूर जिल्ह्यातील अजित पवार गटाचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने, बबनदादा शिंदे यांचे पुत्र आणि काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने या बड्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या बड्या नेत्यांची भेट घेतली. त्यानंतर भाजप मोठ्या तयारीत असल्याचे संकेत मिळाले आहेत.
तर तिकडे सांगोल्यातही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिपक साळूंखे यांची भेट घेतली. त्यामुळे दिपक साळूंखे देखील भाजपच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळाले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार फेल :
सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र गेल्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कमी होताना दिसत आहे. विशेषतः राष्ट्रवादी अजित पवार गट आता सोलापूर जिल्ह्यात नावालाच राहिला आहे की काय अशी स्थिती झाली आहे. यानिमित्ताने अजित पवार यांचे नेतृत्व निष्प्रभ ठरते की काय अशी चिन्हे आहेत.
वास्तविक पाहता पक्ष फुटीनंतरही शरद पवारांनी सोलापूर जिल्ह्यातील आपली नेतृत्वाची निवड आणि जिल्ह्यातील पकड मजबूत ठेवली आहे. मात्र अजित पवार काकांच्या तुलनेत सपशेल फेल ठरले आहेत.
अजित पवार गटाचा पाडाव असाच सुरु राहिला तर मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेत राष्ट्रवादी अजित पवार गट भोपळ्यावरच राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महायुयीच्या दोस्तीत कुस्ती :
वास्तविक पाहता महायुतीच्या दोस्तीत कुस्ती नाही करायची असे ठरलेले असताना शिवसेना शिंदे गटाने या नियमाला छेद दिला. कारण अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना शिवसेनेत प्रवेश दिल्याने भाजपतील वरिष्ठ नेतृत्व नाराज झाले होते.
त्यानंतर मात्र भाजपने आता पक्ष प्रवेशाचा झपाटाच लावल्याने शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट पुरता बेहाल झाला आहे. दोस्तीतील कुस्तीचा हा राजकीय अंक आणखी कोणते राजकीय बॉम्ब टाकणार हे पाहणे महत्वाचे आहे.











