HELLO SOLAPUR | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सोलापूर जिल्हा पक्ष निरीक्षकांनी आपल्या पदाचा राजीनामा तडका-फडकी राजीनामा दिला आहे.
सोलापूर जिल्हा पक्ष निरीक्षक शेखर माने यांनी आपल्या राजीनाम्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे मुंबईतील पक्ष कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेऊन सुपूर्द केले. त्यांच्या या अचानक निर्णयामुळे सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
आपल्या राजीनाम्यात शेखर माने यांनी कारण दिलेय की, “आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सांगली जिल्ह्यातील संघटनेची कामे करण्यासाठी अधिक वेळ द्यावा, अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा पक्ष निरीक्षक पदाची जबाबदारीतून मला मुक्त करण्यात यावे.” त्यामुळे माने यांनी स्वेच्छेने सोलापूर जिल्हा निरीक्षक पदाचा राजीनामा दिला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली :
शेखर माने यांनी सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांदरम्यान निरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली होती. त्यांनी या काळात पक्षाला दोन्ही निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवून दिले असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
“सोलापूर जिल्ह्यात मला दिलेल्या जबाबदाऱ्या मी प्रामाणिकपणे पार पाडल्या. पक्षाला यश मिळालं, ही माझ्यासाठी समाधानाची बाब आहे,” असेही माने यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे.
राजकीय वर्तुळात चर्चा :
शेखर माने हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे निकटवर्तीय मानले जात होते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यानंतर पक्षातील अंतर्गत हालचालींना वेग आल्याचे बोलले जात आहे.
सोलापूरमधील राष्ट्रवादी शरद पवार गटात गेल्या काही दिवसांपासून अनेक बदल घडत आहेत. शहराध्यक्ष पदापासून जिल्हा संघटनेतील पदांपर्यंत सतत हालचाल सुरू आहे. त्यात आता निरीक्षक शेखर माने यांच्या राजीनाम्याने पक्षातील गटबाजी आणि संघटनात्मक बदलांना नव्या चर्चांना वाव मिळाला आहे.
पुढील निवडीकडे लक्ष :
माने यांच्या राजीनाम्यानंतर आता सोलापूर जिल्हा निरीक्षकपद कोणाकडे सोपवले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पक्ष प्रदेश नेतृत्व लवकरच नवीन निरीक्षकाची घोषणा करणार असल्याची चर्चा सुरु आहे.












