HELLO SOLAPUR NEWS | शाळा सोडून तब्बल 16 वर्षे लोटल्यानंतर पुन्हा एकदा वर्गमित्र एकाच छताखाली जमले आणि दयानंद काशिनाथ असावा प्रशालेचा परिसर जुन्या आठवणींनी भारावून गेला. सोलापुरातील दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेच्या सन २०१० मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या (२००९-१०) बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. जुन्या आठवणींना उजाळा देतानाच गुरुजन आणि शाळेप्रति कृतज्ञता करण्यासाठी अत्याधुनिक संगणक संच आणि पुस्तकांची भेट देत माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीही जपली.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी, व्यवसाय आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे राज्यासह देशाच्या विविध भागांत स्थायिक झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या शाळेत हजेरी लावली. अनेक मित्रांची तब्बल १६ वर्षांनंतर प्रत्यक्ष भेट झाली. शाळेच्या प्रवेशद्वारातून आत पाऊल टाकताच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. वर्गखोल्या, बाक, प्रार्थना, मधली सुट्टी, मैदानावरील खेळ, वार्षिक स्नेहसंमेलन, सहली, परीक्षा आणि शिक्षकांनी दिलेले मार्गदर्शन अशा अनेक आठवणींना गप्पांच्या ओघात उजाळा मिळाला. काही काळासाठी उपस्थित सर्वजण पुन्हा शालेय जीवनात रमल्याचे चित्र पाहायला मिळाले.
या स्नेहमेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे शाळेतून सेवा निवृत्त झालेल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांनी आवर्जून निमंत्रित केले होते. आपल्या विद्यार्थ्यांना अनेक वर्षांनी पुन्हा भेटण्याची संधी मिळाल्याने शिक्षकही भावूक झाले. विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा सत्कार करून शिक्षणाबरोबरच जीवनमूल्यांचे धडे दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शाळेने दिलेले संस्कार हेच सर्वात मोठे बळ असल्याचे सांगितले.
केवळ स्नेहमेळावा आयोजित करण्यापुरते न थांबता शाळेप्रती असलेले ऋण व्यक्त करण्यासाठी सन २००९-१० च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी शाळेला अत्याधुनिक संगणक संच तसेच विविध विषयांवरील संदर्भ पुस्तके भेट दिली. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी तसेच वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने ही भेट देण्यात आली. माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
कार्यक्रमात बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा पाटील यांनी माजी विद्यार्थ्यांनी शाळेशी कायम जपलेले नाते आणि शाळेच्या प्रगतीसाठी दाखवलेली बांधिलकी कौतुकास्पद असल्याचे सांगितले. तर शाळेचे माजी मुख्याध्यापक जितेंद्र पवार यांनीही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, व्यावसायिक आणि सामाजिक प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. आज हेच विद्यार्थी विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत असून आपल्या मातृसंस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुन्हा एकत्र आले, ही बाब शिक्षकांसाठी सर्वात मोठा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.
स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी भविष्यातही शाळेच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा तसेच गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी पुढाकार घेण्याचा निर्धार व्यक्त केला. जुन्या मैत्रीचे बंध अधिक दृढ करताना शाळेप्रती असलेले प्रेम आणि गुरुजनांविषयीचा आदर कृतीतून व्यक्त करणारा हा स्नेहमेळावा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील, अशा भावना कार्यक्रमाच्या शेवटी व्यक्त करण्यात आल्या.










