HELLO SOLAPUR | सोलापूर जिल्ह्यातील वळसंग गावात सुरू असलेल्या श्री रामलिंग चौंडेश्वरी यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून यात्रेतील मुख्य आकर्षण असलेल्या ‘बाळबट्टल’ विधीसाठी हजारो भाविकांनी गर्दी केली. यात्रेच्या तिसऱ्या दिवशी मध्यरात्री हा पारंपरिक विधी पार पडला.
हातात तलवार आणि चांदीची वाटी घेत गाव प्रदक्षिणा करणारा बाळबट्टल हे या यात्रेचे मुख्य आकर्षण मानले जाते. वळसंगसह आसपासच्या गावांमधून हजारो भाविक हा सोहळा पाहण्यासाठी यात्रेत सहभागी झाले होते.
श्री रामलिंग चौंडेश्वरी यात्रा ही हटगार कोष्टी समाजाची आराध्यदैवत असलेल्या चौंडेश्वरी देवीची यात्रा असून तिला अडीचशे वर्षांची परंपरा लाभली आहे.
बाळबट्टलच्या पायात तब्बल 40 किलो वजनाचे पारंपरिक 300 घडांचे घुंगरू बांधले जातात. यात्रेसाठी सुमारे 12 किलोमीटरची गाव प्रदक्षिणा काढली जाते आणि हा प्रवास जवळपास सात तास चालतो.
“ये तम्मा, बाळबट्टल बत्तरो…” अशा आरोळ्या देत हातात मशाली घेऊन गावाबाहेर धावणारे युवक हा यात्रेतील अत्यंत रोमांचक क्षण ठरतो. हा सोहळा पाहताना भाविकांच्या अंगावर शहारे येतात.
दर्श अमावस्येच्या दिवशी बाळबट्टलला चांदीची वाटी, तलवार, हार, दंडे आणि मुकुटाने सजवले जाते. त्याचबरोबर लाल, हिरवा, पिवळा, काळा, पांढरा आणि केशरी रंगांनी त्याचा चेहरा रंगवला जातो.
स्थानिक परंपरेनुसार, सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी कर्नाटकातील माशाळ गावातून वीर नावाच्या बालकाने ‘बट्टल’ म्हणजेच चांदीची वाटी वळसंग येथे आणली होती. ही बाब समजताच माशाळ गावातील लोकांनी त्या बालकाचा पाठलाग केला. मात्र तो धावत वळसंग येथे पोहोचला आणि तेव्हापासून ही चांदीची वाटी वळसंगमध्येच असल्याची श्रद्धा आहे.
आजही माशाळ गावातील लोक ही वाटी परत घेण्यासाठी येऊ शकतात, अशी धारणा ग्रामस्थांमध्ये असल्याने संपूर्ण रात्र जागरण करून या वाटीचे संरक्षण केले जाते. पूर्वी तलवारी आणि विविध शस्त्रे हातात घेऊन ग्रामस्थ संरक्षण करत असत. मात्र मागील पाच ते सहा वर्षांपासून प्रशासनाने शस्त्र वापरण्यास बंदी घातल्याने आता शस्त्रांशिवाय ही यात्रा पार पडते.










