HELLO SOLAPUR | सोलापूर जिल्ह्यातील कारकल गावात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या बहीण-भावांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रवण संतोषकुमार अंकलगी (वय १५) आणि श्रावणी संतोषकुमार अंकलगी (वय १०) अशी मृत मुलांची नावे आहेत. या दोघांचे वडील संतोषकुमार अंकलगी यांचे दोन वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले होते. त्यानंतर आई उषा अंकलगी या आपल्या आई महादेवी कोळी आणि दोन्ही मुलांसह दक्षिण सोलापूर तालुक्यातील कारकल येथील शेतात राहत होत्या.
अंकलगी कुटुंबाचे शेत शिरनाळ येथील विद्यानंद वालीकर हे बटईने करत होते. घटनेच्या दिवशी सकाळी उषा अंकलगी या कामानिमित्त सोलापूरला गेल्या होत्या. श्रवणला शाळेला सुट्टी असल्याने तो घरीच होता. दुपारच्या सुमारास श्रवण आणि त्याची लहान बहीण श्रावणी हे दोघे शेतातील अंदाजे १०० बाय १०० फूट आकाराच्या शेततळ्यात पोहण्यासाठी गेले.
पाण्यातून वर येण्यासाठी त्यांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून झाडाला दोरी बांधून ती कमरेला बांधली होती. मात्र दुर्दैवाने ती दोरी अचानक सुटली. त्यामुळे दोघेही पाण्यात अडकले आणि हळूहळू बुडू लागले. त्या वेळी त्यांना मदतीसाठी आसपास कोणीही उपस्थित नव्हते.
बराच वेळ झाला तरी नातवंडे परत आली नाहीत आणि त्यांच्या आवाजाचाही मागमूस लागला नाही, त्यामुळे आजी महादेवी कोळी यांना संशय आला. त्या घाबरून शेततळ्याकडे धावत गेल्या असता, दोन्ही मुले पाण्यात बुडालेली दिसली. त्यांनी तत्काळ आरडाओरडा केला.
त्यांचा आवाज ऐकून शेतात काम करणारे विद्यानंद वालीकर घटनास्थळी धावले. त्यांनी तत्काळ शेजारील मल्लीकार्जुन सोनगी आणि महादेव कांबळे यांना बोलावले. तिघांनीही तळ्यात उडी घेऊन दोघांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
बेशुद्ध अवस्थेत श्रवण आणि श्रावणी यांना तातडीने मंद्रूप येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेची नोंद मंद्रूप पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
भावनिक पार्श्वभूमी आधीच वडिलांच्या निधनाचा आघात सहन केलेल्या या कुटुंबावर पुन्हा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एकाच वेळी दोन मुलांना गमावल्यामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.









