HELLO SOLAPUR | सोलापूर महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये अपेक्षित यश न मिळाल्यानंतर काँग्रेस नेत्या, खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांना भावनिक आणि प्रेरणादायी संदेश दिला आहे. पराभव मान्य करत असतानाच त्यांनी हा पराभव अंतिम नसून, भविष्यातील संघर्षासाठी आत्मपरीक्षणाची संधी असल्याचं स्पष्ट केलं आहे. (MP Praniti Shinde message to Congress workers after Mahapalika Election defeat)
प्रणिती शिंदे यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे की, अनेक महिन्यांची मेहनत, रस्त्या-रस्त्यांवर फिरून केलेला संघर्ष आणि लोकांपर्यंत पोहोचवलेला विचार निवडणूक निकालात आकड्यांमध्ये उतरला नसला, तरी कार्यकर्त्यांची निष्ठा आणि प्रामाणिकपणा कधीही हरलेला नाही.
निवडणुकांदरम्यान बलाढ्य धनशक्ती, सत्तेचा दुरुपयोग, प्रशासकीय यंत्रणांचा गैरवापर तसेच धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रभाव असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
या प्रतिकूल परिस्थितीतही काँग्रेस कार्यकर्ते शेवटच्या क्षणापर्यंत सोलापूरच्या हितासाठी लढत राहिले, असं त्यांनी नमूद केलं.
“राजकारणात जय-पराजय येत-जात असतात. मात्र कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास, निष्ठा आणि प्रामाणिकपणा हीच खरी शिदोरी आहे,” असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला.
या निकालातून आत्मपरीक्षण करत लोकांच्या अपेक्षा, स्थानिक प्रश्न आणि बदलतं सामाजिक वास्तव अधिक खोलवर समजून घेण्याची गरज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. भविष्यात बलाढ्य धनशक्तीला कशा पद्धतीने तोंड द्यायचं, यावर गंभीर चिंतन करून संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
संदेशाच्या शेवटी त्यांनी, “आज थोडा विराम घेऊ, पण उद्याच्या लढाईसाठी अधिक सज्ज होऊ,” असं सांगत पुढील राजकीय संघर्षासाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलं आहे.











