HELLO SOLAPUR | सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी जिल्ह्यातील नागरी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या विषयावर सभागृहाचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या या विषयामुळे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
सोलापूरची जीवनदायीनी असलेल्या उजनी धरणातील पाण्यात कुरकुंभसह विविध एमआयडीसी तसेच पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील दूषित पाणी मिसळले जात आहे. परिणामी सोलापुरात मोठ्या प्रमाणावर कॅन्सरचे रुग्ण वाढत आहेत, असा अत्यंत गंभीर निष्कर्ष मांडत यावर महाराष्ट्र शासनाने दीर्घकालीन उपाययोजना करावी, अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी बुधवारी केली.
मुंबई येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार देवेंद्र कोठे यांनी ही मागणी केली.
आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, काही तज्ज्ञांच्या मते पुण्यातील कुरकुंभ एमआयडीसी, पिंपरी चिंचवड तसेच पुणे शहरातून दूषित पाणी उजनीत मिसळले जात आहे. हा प्रकार गेल्या ३० ते ४० वर्षांपासून सुरू असून यावर वेळीच उपाययोजना न केल्यामुळे या पाण्यामुळे सोलापूर शहर जिल्ह्यात कर्करोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत.
सोलापुरात कर्करोगावर उपचार करणारी ५ ते ६ मोठी रुग्णालय सुरू आहेत. रिलायन्स समूहासारख्या मोठ्या समूहानेदेखील सोलापुरात रुग्णालय सुरू केले आहे. यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरणातील प्रदूषणावर दीर्घकालीन उपाययोजना होणे गरजेचे आहे. या समस्येवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निश्चितपणे मार्ग काढतील, असा विश्वासही आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
कॅन्सरच्या आजारातून सोलापूरकरांची सुटका करण्यासाठी कटिबद्ध :
उजनी धरणातील दूषित पाणीपुरवठ्यामुळे सोलापुरात वाढत असलेल्या जीवघेण्या कॅन्सरच्या आजारापासून सोलापूरकरांची सुटका करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सोलापूरकरांना केवळ मुबलक पाणीपुरवठा न करता पाणीपुरवठा स्वच्छदेखील असला पाहिजे यासाठी आम्ही आग्रही आहोत. विकसित महाराष्ट्रासोबतच विकसित सोलापूरचे ध्येय गाठण्यासाठी शहराला मुबलक आणि शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रही मागणी करण्यात येणार आहे.
– देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य











