HELLO SOLAPUR | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली असून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी 30 मेपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे. “मेलो तर मेलो, पण आता मागे हटणार नाही,” असा इशारा देत त्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.
पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, सरकारने मराठा समाजाला वारंवार आश्वासने दिली, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस अंमलबजावणी केली नाही. “आम्ही चर्चेला कधीच नकार दिला नाही. मात्र आता फोनवरून चर्चा होणार नाही. सरकारलाच उत्तर द्यायला जागा उरलेली नाही,” असे ते म्हणाले.
30 मेपासून सुरू होणारे उपोषण अत्यंत टोकाचे असेल, असे स्पष्ट करत त्यांनी कोणत्याही मराठा बांधवांनी अंतरवाली सराटीत गर्दी करू नये, असे आवाहन केले. “मंडपात नाही, तर भर रणरणत्या उन्हात उपोषण करणार. उष्माघाताने माझा बळी गेला तरी मी मागे हटणार नाही,” असा भावनिक निर्धार त्यांनी व्यक्त केला.
मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांमध्ये हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देणे, आंदोलनादरम्यान बलिदान दिलेल्या कुटुंबियांना शासकीय नोकरी देणे, तसेच आंदोलनातील तरुणांवरील गुन्हे मागे घेणे या मागण्यांचा समावेश आहे.
“कुणबी आणि मराठा हे दोन्ही एकच आहेत. सरकारला फक्त मराठ्यांची मते पाहिजेत, पण आरक्षणाच्या प्रश्नावर निर्णय घ्यायची वेळ आली की टाळाटाळ केली जाते,” असा आरोपही त्यांनी केला.
मुख्यमंत्री यांच्याबाबत बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “आम्ही मुख्यमंत्री फडणवीस यांचे विरोधक नाही. त्यांनी शंभर टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. अजूनही त्यांच्याकडे मराठा समाजाची मनं जिंकण्याची संधी आहे.”
“मराठा समाज हा लढणारा समाज आहे. केवळ आश्वासनांवर आता समाज थांबणार नाही. चर्चा खूप झाल्या, आता निर्णय हवा,” असे सांगत त्यांनी सरकारवर दबाव वाढवला.
यावेळी त्यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील परिस्थितीवरही भाष्य केले. “मराठा समाजाला ना पाणी मिळत आहे, ना आरक्षण. गोरगरीब मराठा तरुणांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, जरांगे पाटील यांच्या या घोषणेमुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्याच्या राजकीय केंद्रस्थानी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









