HELLO SOLAPUR | मोहोळच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असा ठाम शब्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. भाजपा युवानेते सोमेश क्षीरसागर यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली.
या भेटीत मोहोळ शहर, तालुका व विधानसभा मतदारसंघाशी संबंधित विविध विकासाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या भारतीय जनता पक्षात प्रवेशामुळे गेल्या सुमारे ३० वर्षांपासून सुरू असलेला पाटील–क्षीरसागर राजकीय संघर्ष संपुष्टात आला आहे.
त्यामुळे मोहोळ शहरात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी नगरपरिषद व इतर निवडणुकांमध्ये भाजपला निश्चितच यश मिळेल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे व्यक्त करण्यात आला.
भाजपा युवानेते सोमेश क्षीरसागर यांनी सांगितले की, मोहोळ नगरपरिषद निवडणूक ही माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली, तर भाजपा ज्येष्ठ नेते नागनाथभाऊ क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ज्येष्ठ नेतेमंडळी एकत्र येऊन लढवत आहेत. या एकजुटीचा सकारात्मक परिणाम निवडणुकीत दिसून येईल.
यावेळी सोमेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आग्रही मागणी करत सांगितले की, माजी आमदार यशवंत माने यांच्या कार्यकाळात मोहोळ शहर व तालुक्याला जेवढा विकासनिधी मिळाला होता, त्यापेक्षा अधिक निधी भविष्यात मोहोळसाठी उपलब्ध करून द्यावा.
या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, “मोहोळच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही,” असे स्पष्ट आश्वासन दिले.
तसेच, मोहोळ विधानसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधा, नागरी विकास, नगरपरिषद निवडणूक तसेच आगामी काळातील विकास आराखडा यावरही यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
राजन पाटील- नागनाथ क्षीरसागर संघर्ष संपल्यामुळे मोहोळ शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, याचा फायदा येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपला होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.











