HELLO SOLAPUR NEWS | सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (डीसीसी) बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपचे आमदार राजेंद्र (राजाभाऊ) राऊत यांचे जोरदार कौतुक करत विरोधकांवर, विशेषतः मोहिते पाटील कुटुंबावर नाव न घेता टीकास्त्र सोडले. “राजेंद्र राऊत म्हणजे पक्षाचे बाजीप्रभू देशपांडे आहेत,” असे म्हणत त्यांनी राऊत यांच्या पक्षनिष्ठेचा गौरव केला.
गोरे म्हणाले की, पक्ष नेतृत्वाला गरज भासली तेव्हा राजाभाऊ राऊत यांनी कोणताही विचार न करता मैदानात उतरून लढा दिला. त्यामुळेच आम्ही त्यांना “बाजीप्रभू देशपांडे” म्हणतो, असे त्यांनी स्पष्ट केले. (Guardian Minister Jaykumar Gore says mla Rajendra Raut is bajiprabhu Deshpande)
यावेळी त्यांनी सोलापूर डीसीसी बँकेची निवडणूक राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाईल, असे जाहीर करत भाजप एकसंघ असल्याचा संदेश दिला.
पालकमंत्री गोरे यांनी जिल्ह्यात भाजपची वाढ ही केवळ एका व्यक्तीमुळे झालेली नसल्याचे स्पष्ट केले. “मी जिल्ह्यात आलो म्हणून भाजप वाढला असे नाही. जिल्ह्यातील सर्व ताकदवान नेते एकत्र आले, त्यामुळे आज जिल्हा भाजपमय झाला आहे. मी नेतृत्व करत असलो तरी हे यश सर्वांच्या एकजुटीमुळे मिळाले,” असे ते म्हणाले.
सहकार क्षेत्रातील कारभारावर टीका करताना त्यांनी काही लोकांनी सहकारी संस्था या स्वतःचे कुटुंब चालवण्यासाठी वापरल्या, त्यामुळे जिल्हा बँक अडचणीत आली, असा आरोप केला. मात्र, आता पुढे बँक अडचणीत येऊ दिली जाणार नाही. संचालकांनी मालक म्हणून नव्हे तर विश्वस्त म्हणून काम केले तरच बँकेचा कारभार योग्य पद्धतीने चालेल, असे त्यांनी सांगितले.
गोरे यांनी विरोधकांवर निशाणा साधताना, “अनेक लोकांची दुकाने बंद झाली आहेत. काहींवर दुकानाला टाळे ठोकण्याची वेळ आली आहे. कोणी दिल्लीत, कोणी काठेवाडीत तर कोणी ठाण्यात आश्रय शोधत आहे. मात्र आता कोणी कुठेही गेले तरी काही होणार नाही,” असा टोला लगावला.
राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी, “देशातील विरोधी पक्षांचे नेते कोणाच्याही नेतृत्वाखाली जाऊ शकतात. मात्र भारत पुढील २५ वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच वाटचाल करेल,” असा विश्वास व्यक्त केला.
डीसीसी बँकेच्या निवडणुकीबाबत बोलताना गोरे म्हणाले की, ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सेवक, कर्मचारी आणि बहुतांश घटकांची इच्छा आहे. मात्र काही लोकांना “आम्हाला विचारले पाहिजे” असा अहंकार असल्यामुळे निवडणूक लागू शकते, असा दावा त्यांनी केला.
“मी कोणाची जिरवायला आलो नाही, तर शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आलो आहे. जिल्ह्यात निर्माण झालेल्या टोळ्या संपवण्यासाठी आलो आहे. कायद्यातून मार्ग काढून काम करायचे असते आणि ते देवा भाऊच करू शकतात,” असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.
सहकार क्षेत्रात काम करण्याची तयारी दर्शवत गोरे म्हणाले, “जिल्ह्यातील सहकारी संस्था योग्य पद्धतीने चालवायच्या असतील तर देवाभाऊ आणि मी वकील म्हणून काम करू. मात्र मला सहकाराच्या विषयात बोलावले जात नाही, कारण काही संस्थानिकांना माझी उपस्थिती अडचणीची वाटते.”
जयकुमार गोरे यांच्या या वक्तव्यांमुळे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची राजकीय रंगत आणखी वाढली असून, येत्या काळात या निवडणुकीत भाजप आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.










