HELLO SOLAPUR NEWS | मुंबईत झालेल्या अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेच्या मेळाव्यात महत्त्वाच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र विधानसभेत महात्मा बसवेश्वर महाराजांचे तैलचित्र लावण्याच्या मागणीला विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मंजुरी दिल्याची माहिती वीरशैव लिंगायत महासभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी दिली आहे.
व्हीओ :
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जगद्गुरू श्री श्री श्री 1008 डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी, काशीपीठ यांच्या दिव्य सानिध्यात अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेचा मेळावा पार पडला.
यावेळी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री ईश्वर खंड्रे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच देशभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या वीरशैव लिंगायत समाजातील मान्यवरांचा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी समाजाच्या विविध मागण्या मांडल्या.
यामध्ये वीरशैव लिंगायत समाजाला यापुढे ‘सकल वीरशैव समाज’ म्हणून संबोधावे, महाराष्ट्र विधानसभेत महात्मा बसवेश्वर महाराजांचे तैलचित्र लावावे, नवी मुंबई परिसरात समाजासाठी एक एकर जागा उपलब्ध करून द्यावी, तसेच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात वीरशैव समाजाला प्रतिनिधित्व द्यावे, अशा मागण्यांचा समावेश होता.
तसंच वीरशैव लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा आणि अल्पसंख्याक दर्जा देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
या मागण्यांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच महाराष्ट्र विधानसभेत महात्मा बसवेश्वर महाराजांचे तैलचित्र लावण्यात येईल, असे सांगितल्याची माहिती विश्वनाथ चाकोते यांनी दिली.
दरम्यान, २०१३ मध्ये तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी वीरशैव लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, केंद्रातील सरकार बदलल्यानंतर ही मागणी प्रलंबित राहिल्याचे चाकोते यांनी सांगितले.
यावेळी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनीही मंत्रिमंडळात वीरशैव समाजाला प्रतिनिधित्व देण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.
मेळाव्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना ‘वीरशैवरत्न’, ‘बसवरत्न’, ‘वीरशैव भूषण’, ‘पंचाचार्य रत्न’, ‘विठ्ठल सेवा पुरस्कार’, ‘अक्कमहादेवी रत्न’ आणि ‘वीरशैव आरोग्यदूत’ अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि देशाच्या विविध भागांतून वीरशैव समाजाचे पदाधिकारी आणि बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महात्मा बसवेश्वरांचे विचार आणि कार्य महाराष्ट्राच्या विधानसभेत तैलचित्राच्या माध्यमातून अधोरेखित होणार असल्याने वीरशैव समाजाच्या या मागणीला महत्त्व प्राप्त झाले आहे. विधानसभेच्या अध्यक्षांनी दिलेल्या या सकारात्मक प्रतिसादाची अंमलबजावणी कधी होते, याकडे आता समाजाचे लक्ष लागले आहे.











