HELLO SOLAPUR | राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे नेते उमेश पाटील यांनी आमदार यांच्यावर अत्यंत गंभीर आणि आक्रमक आरोप करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. बारामतीच्या राजकारणापासून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांपर्यंत, भाजपमध्ये जाण्याच्या कथित प्रयत्नांपासून अजितदादांच्या अपघाताच्या मुद्द्यापर्यंत अनेक विषयांवर उमेश पाटील यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला.
“रोहित पवारांचा छुपा अजेंडा बारामतीवर कब्जा करण्याचा”
उमेश पाटील म्हणाले की, रोहित पवारांच्या विधानातून त्यांचा खरा अजेंडा स्पष्ट दिसत आहे. अजितदादांची राजकीय लिगसी स्वतःभोवती केंद्रित करण्यासाठी हा सगळा उद्योग सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. अजित पवारांच्या निधनानंतर बारामती मतदारसंघ मोकळा झाल्यासारखे काहींना वाटत असून, त्या मतदारसंघावर दावा करण्यासाठी सहानुभूती गोळा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले.
“बारामतीचा किल्ला आणि त्याची तटबंदी अभेद्य आहे. रोहित पवारांसारख्या बांडगुळांना बारामतीवर वर्चस्व गाजवता येणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी टीका केली.
“अजितदादांचा छळ केला, आता कळवळा दाखवत आहेत”
पुढे बोलताना उमेश पाटील यांनी सांगितले की, वडील किंवा पती गमावल्याचे दुःख काय असते हे आम्हाला माहिती आहे, मात्र अजितदादांचा किती छळ झाला हेही आम्ही पाहिले आहे. सुनेत्रा पवार लोकसभेला उभ्या राहिल्यानंतर रोहित पवारांनी केलेली भाषणे सर्वांनी ऐकली आहेत. “तेव्हा ते काका-काकी नव्हते का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्यांच्या मते, अजितदादा जिवंत असताना त्यांना साथ द्यायला हवी होती. मात्र आता सहानुभूती दाखवून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
राष्ट्रवादी विलीनीकरणावर मोठं विधान
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर बोलताना उमेश पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “राष्ट्रवादीचे विलीनीकरण कधीही होणार नाही. आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना ते मान्य नाही. हे कायमचे लॉक करून ठेवा.”
तुतारी गटातील आमदार आणि खासदार घड्याळाकडे परत येऊ नयेत म्हणून सातत्याने विलीनीकरणाचे गाजर दाखवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “विलीनीकरणाची चर्चा आमच्याकडून नाही, तर त्यांच्या पक्षातील आजी-माजी प्रदेशाध्यक्ष आणि रोहित पवार करत आहेत,” असेही ते म्हणाले.
“सुनेत्रा पवारांची निवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून प्रयत्न”
उमेश पाटील यांनी दावा केला की, यांची निवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून विरोधकांनी प्रयत्न केले. अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांना “अर्ज काढू नका” असे सांगण्यात आले होते, असा आरोप त्यांनी केला.
त्याचबरोबर त्यांनी रोहित पवारांवर मतदानाच्या दिवशी बारामती अॅग्रोच्या कर्मचाऱ्यांना सुट्टी न दिल्याचा आरोप करत, “रेकॉर्डब्रेक मतदान होऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांना मतदानापासून रोखण्यात आले,” असे म्हटले.
“2016 मध्ये भाजपमध्ये जाण्याची धमकी दिली होती”
उमेश पाटील यांनी मोठा दावा करत सांगितले की, 2016 च्या पुणे जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान रोहित पवार यांनी तिकीट न दिल्यास भाजपमध्ये जाण्याची धमकी यांना दिली होती.
“त्यावेळी शरद पवारांनी अजितदादांना विचारायला सांगितले होते. त्यामुळे 2016 मध्ये रोहित पवार भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
“रोहित पवारांना मंत्रीपद हवे होते”
उमेश पाटील म्हणाले की, रोहित पवारांना मंत्री होण्याची अपेक्षा होती. मात्र त्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर त्यांनी आमच्या नेत्यांविरोधात भूमिका घ्यायला सुरुवात केली. “उद्या कुठूनही ऑफर मिळाली तर ते तिकडे जाऊ शकतात,” असा टोला त्यांनी लगावला.
“कर्जत-जामखेडपेक्षा राष्ट्रवादीत जास्त रस”
कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रश्नांपेक्षा राष्ट्रवादीतील घडामोडींमध्येच रोहित पवारांना जास्त रस असल्याचा आरोप करत उमेश पाटील म्हणाले की, ते भाजप किंवा यांच्या विरोधात बोलताना कधी दिसत नाहीत.
“एमआयडीसीच्या आश्वासनावर ते बोलत नाहीत, पण आमच्या पक्षातील घडामोडींवर मात्र सतत प्रतिक्रिया देतात,” असे ते म्हणाले.
“स्वतःला सुपर पॉवर समजतात का?”
राज्यातील मंत्रीमंडळ फेरबदलावर बोलताना उमेश पाटील यांनी सांगितले की, कोणाला मंत्री करायचे किंवा काढायचे हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. “रोहित पवार स्वतःला मुख्यमंत्र्यांपेक्षा वरचे सुपर पॉवर समजतात का?” असा सवाल त्यांनी केला.
“शरद पवारांकडे गाऱ्हाणं मांडण्याचा प्रश्नच नाही”
उमेश पाटील यांनी स्पष्ट केले की, घड्याळ चिन्हाच्या पक्षातील कोणीही नेते शरद पवारांकडे जाऊन गाऱ्हाणे मांडत नाहीत. “आमचा पक्ष शरद पवारांच्या नव्हे तर सुनेत्रा पवारांच्या विचारांनी चालतो,” असे ते म्हणाले.
त्यांनी रोहित पवारांवर “फेक स्टेटमेंट” करण्याचा आरोप करत सांगितले की, माध्यमांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक बातम्या पेरल्या जात आहेत.
“अजितदादांनंतर दोन तासांत आमदारांना कॉल”
उमेश पाटील यांनी दावा केला की, अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या दोन तासांत रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन केले. “आपल्याला एकत्र यावे लागेल आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागेल,” असे संदेश दिले गेले होते.
त्यांच्या मते, हा प्रयत्न अजितदादांच्या कुटुंबीयांना बाजूला करून पक्ष ताब्यात घेण्याचा होता. “तुतारीच्या नेत्यांना विलीनीकरणाच्या नावाखाली पक्ष गिळंकृत करण्याची घाई झाली होती,” असा आरोप त्यांनी केला.
“त्यामुळेच सुनेत्रा पवारांना तातडीने उपमुख्यमंत्रीपद”
या घडामोडी लक्षात आल्यानंतरच सुनेत्रा पवार यांना तातडीने उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. “त्या अस्वस्थतेतूनच रोहित पवार आमच्या पक्षाला सतत टार्गेट करत आहेत,” असे ते म्हणाले.
“रोहित पवारांचा स्वभाव बारामतीला माहिती”
रोहित पवारांच्या स्वभावावरही उमेश पाटील यांनी टीका केली. “कार्यकर्ता जवळ आलेला त्यांना सहन होत नाही. त्यांच्या भोवती शंभर-दीडशे पीए आहेत. कार्यकर्त्याला फिल्टरमधून जावे लागते,” असा आरोप त्यांनी केला.
त्याउलट यांच्याबाबत बोलताना, “कोणताही कार्यकर्ता थेट पार्थ पवारांना फोन करू शकतो,” असे ते म्हणाले.
“रोहित पवार थेट फोन करणाऱ्यांना शिव्या देतात”
उमेश पाटील म्हणाले की, रोहित पवारांना थेट कॉल केला तर लोकांना शिव्या पडतात. त्यामुळे त्यांना स्वभाव बदलण्याची गरज आहे, असा सल्लाही त्यांनी दिला.
कृषी कर्जमाफीवर सरकारचे स्वागत
कृषी कर्जमाफीबाबत बोलताना उमेश पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्या भूमिकेचे स्वागत केले. “30 जूनपर्यंत कर्जमाफीबाबत निर्णय होणार आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत असून हा निर्णय दिलासादायक आहे,” असे ते म्हणाले.
“फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा सत्तेत असलेला पक्ष म्हणजे राष्ट्रवादी”
राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, फुले, शाहू, आंबेडकर आणि यांच्या विचारांवर चालणारा आणि सत्तेत असलेला एकमेव पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आहे.
त्यांच्या मते, विरोधी पक्षातील अनेक आमदार आणि खासदार विकासकामांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत आणि लवकरच मोठ्या घडामोडी दिसतील.
“अजित पवारांचा अपघात की घातपात?”
अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना उमेश पाटील म्हणाले की, “घातपात की अपघात याबाबत त्यांच्याच पक्षातील सर्वोच्च नेत्यांनी आधीच पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले होते.”
तथापि, रोहित पवारांनी उपस्थित केलेले काही मुद्दे योग्य असल्याचे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, “त्या मुद्द्यांवर आम्ही सीबीआयकडे पत्रही दिले आहे.” मात्र त्यांचा उद्देश सत्य शोधणे नसून सहानुभूती स्वतःकडे केंद्रित करणे आणि भविष्यात बारामतीवर दावा मजबूत करणे हा असल्याचा आरोप त्यांनी पुन्हा केला.









