HELLO SOLAPUR | दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव परिसरात दगड खाणीत बुडालेल्या दहा वर्षीय शाळकरी मुलाचा मृतदेह चौथ्या दिवशी पाण्यावर तरंगताना आढळून आला. श्रीहर्ष उर्फ यश श्रीहरी हब्बू असे या दुर्दैवी बालकाचे नाव असून रविवारी सकाळी त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
त्यानंतर शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. दुपारी कुटुंबीय व ग्रामस्थांच्या उपस्थितीत अत्यंत दुःखद वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कासेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत चौथी इयत्तेत शिकणारा यश गुरुवारी (१२ मार्च) दुपारी आपल्या काकांसह आणि त्यांच्या मित्रांसोबत कासेगाव हद्दीतील ब्रह्मनाथ मंदिर परिसरातील दगड खाणीजवळ गेला होता. काकांसह इतर जण पोहण्यासाठी पाण्यात गेले असताना यश काठावर बसला होता. दरम्यान, तोल जाऊन तो पाण्यात पडल्याने बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि सोलापूर तालुका पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवस सतत शोधकार्य सुरू होते. यासाठी पाण्यात बोटीद्वारे तसेच खोलवर गळ टाकूनही शोध घेण्यात आला.
दरम्यान, शोधमोहीमेदरम्यान पोलिस उपनिरीक्षक घोडके, पोलिस निरीक्षक देशपांडे, डब्ल्यू.पी.एस.आय. डोंगरीतोट, सुपे मॅडम, तलाठी हुडेवाले, सर्कल अधिकारी माळी तसेच तहसीलदार किरण जगदाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर तसेच एएसआय बाणेवाले हेही घटनास्थळी उपस्थित होते.
यशचा शोध घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ढोले, अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारी रावसाहेब मगर, चालक मिलिंद सुरवसे तसेच फायरमन सचिन लोकरे, राजू चिंता, संकेत कुंभार आणि महेश गेंड यांनी मोठे प्रयत्न केले. उच्च दर्जाच्या कॅमेऱ्याच्या सहाय्याने सुमारे ७० ते ८० फूट खोलवरही तपासणी करण्यात आली होती.
मात्र, अखेर रविवारी सकाळी यशचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. त्याला बाहेर काढून शासकीय रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
एएसआय बाणेवाले व पोलिस कॉन्स्टेबल अकबर शेख यांनी पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी गावातील शोकाकुल वातावरणात यशवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे परिसरातील दगड खाणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.











