HELLO SOLAPUR | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज लोकभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. अजितदादांच्या निधनानंतर पहिल्यांदाच त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या X हॅन्डलवर पोस्ट केलीय त्याचा सारांश खालीलप्रमाणे आहे…
आज लोकभवन, मुंबई येथे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना माझं मन अत्यंत भावूक झालं आहे. हा क्षण माझ्यासाठी केवळ राजकीय नाही, तर आयुष्यभराची जबाबदारी आणि जनतेप्रती असलेल्या बांधिलकीची जाणीव करून देणारा आहे.
आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि समाजातील वंचित घटकांसाठी संघर्ष केला. सत्तेत असताना असो किंवा विरोधात, त्यांनी नेहमीच सामान्य माणसाच्या प्रश्नांना प्राधान्य दिलं. लोकांच्या अडचणी सोडवणं हेच त्यांचं राजकारण होतं… आणि जनतेची सेवा हाच त्यांचा धर्म होता.
आज ते आपल्यात नाहीत, ही वेदना शब्दांत व्यक्त करणं कठीण आहे. दादांच्या अकाली जाण्याने मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. पण त्यांनी दिलेली शिकवण, त्यांची कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची अढळ बांधिलकी मला प्रत्येक क्षणी प्रेरणा देत राहते.
‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या समतेच्या, सामाजिक न्यायाच्या आणि प्रगतीच्या विचारांवर चालत महाराष्ट्र घडवण्याचा त्यांचा ध्यास होता. त्याच विचारांचा वारसा पुढे नेण्याचा मी आज निर्धार करतो.
उपमुख्यमंत्री पद ही माझ्यासाठी सत्ता नसून सेवा आहे.
ही खुर्ची नाही, तर जबाबदारी आहे.
हा मान नाही, तर जनतेच्या विश्वासाचं ओझं आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी, कामगार, महिला, युवक, विद्यार्थी, उद्योजक आणि प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबाच्या विकासासाठी शासन तुमच्या दारात नेण्याचं काम आम्ही करू.
न्यायप्रिय, पारदर्शक आणि सर्वसमावेशक प्रशासन देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू.
या कठीण प्रसंगी महाराष्ट्रातील जनतेने दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठिंबा हेच माझं खरं बळ आहे. तुमच्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मी अहोरात्र काम करत राहीन.
चला, आपण सर्वजण मिळून एक समताधिष्ठित, प्रगत आणि विकसित महाराष्ट्र घडवूया.











